डम्पिंग ग्राऊंड बंद झाले तरीही डम्पिंगच्या धूरा अन् धुळीमुळे नागरिक हैराण
लहान मुल व वृद्ध नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
- Advertisement -
दिवा शहरात धुराचे आणि धुळीचे प्रमाण मागील 15 ते 20 दिवसापासून प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता घसरली आहे. धूर आणि धुळीमुळे दिवा शहरातील नागरिकांचे संपूर्ण आरोग्य धोक्यात आले आहे. दिवा शहरातील वाढत्या धुळ आणि धुराच्या प्रमाणामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे आजार वाढले असून अशा प्रकारचे वातावरण दमा व लहान मुलांमध्ये खोकल्याचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरते, असे येथील डॉक्टर सांगतात. डम्पिंग ग्राउंड बंद केल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने येथील डम्पिंग मधून निघणारा धूर व धूळ यावर प्रक्रिया होणे अपेक्षित होते. ठाणे महानगरपालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्याने दिवा शहरात धुराचे व धुळीचे साम्राज्य असल्याचा आरोप आता दिव्यातील जाणकार नागरिक करत आहेत. एकीकडे डम्पिंग ग्राउंड बंद झाल्याचा आनंद दिवावासीयांना असतानाच दुसरीकडे बंद झालेल्या डंपिंग ग्राउंड मधून सतत निघणारा धूर आणि धूळ यामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारी दिवा शहरातील स्थानिक नागरिक करत आहेत. सायंकाळच्या वेळेला दिवा शहरातील धुराचे आणि धुळीचे प्रमाण स्पष्टपणे जाणवते. रस्त्याने चालत जाणारे नागरिक पालिकेच्या निष्काळजीपणाची चर्चा करतात. नागरिकांना अक्षरशः नाकावर रुमाल घेऊन चालावे लागते. मास्क लावण्याशिवाय लहान मुलं वृद्धांना पर्याय राहत नाही. वाढलेल्या धूर आणि धूळ प्रदूषणामुळे मोकळा श्वास दिव्यातील नागरिक घेऊ शकत नाहीत. शहरातील अनेक इमारतींच्या घरांमध्ये धूळ साचलेली पाहायला मिळते. राहत्या घरात दररोज येणारी धूळ अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना समस्या भेडसावत असताना दिवा प्रभाग समिती मधील स्थानिक अधिकारी करतात काय? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. डम्पिंग ग्राउंड वर लागणारी आग विजवण्याचं काम वेळेत होत नाही. परिणामी दिवा शहरातील नागरिकांना धुराच्या समस्येला सामोरे जावे लागते. ठाणे महानगरपालिकेच्या घन कचरा विभागाने ही समस्या गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. केवळ डम्पिंग ग्राउंड बंद केले म्हणजे दिव्यातील प्रदूषणाचा प्रश्न सुटला अशातला भाग होत नाही. तर बंद केलेल्या डंपिंग ग्राउंड वरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे, हे ठाणे महानगरपालिका प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे. डम्पिंग ग्राउंड वरून निघणारा धूर व धुळामुळे दिवा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरातील डॉक्टरांकडे खोकल्याच्या रुग्णांची वाढलेली संख्या हे त्याचे बोलके उदाहरण आहे. महापालिकेने याचे सर्वेक्षण केल्यास धूळ आणि धुरामुळे दिव्यात आजारी पडणारी लहान मुलं व नागरिक याचा अंदाज महापालिका प्रशासनाला येईल. प्रशासनाने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.